महेश आनंदा लोंढे (संपादक)
नवी दिल्ली : चर्चा, संवाद आणि भारताचे आर्थिक धोरण आणि विकास यासंदर्भात भारतीय आणि जागतिक नेत्यांमधली चर्चा, यासाठीचा जागतिक मंच असलेली 25 वी भागीदारी परिषद आजपासून मुंबईत सुरु होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या परिषदेत बैठकांच्या माध्यमातून नवी भागीदारी आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी अपेक्षित आहेत.
नव भारत म्हणून आणि नवी जागतिक आर्थिक शक्ती म्हणून सध्याच्या भारताचे यथार्थ दर्शन या परिषदेत घडेल. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग, महाराष्ट्र सरकार आणि भारतीय उद्योग महासंघाने ही परिषद आयोजित केली आहे.
धोरणकर्ते, संस्था, व्यापार, माध्यम आणि शिक्षण संस्था या संबंधी परिषदेत चर्चा होणार आहे. नवभारताशी भागीदारी, सुधारणा-गुंतवणुकीला चालना देण्यासाठीचे धोरण, नवकल्पना, इंडिया 4.0, ए आय, बिग डाटा, कृषी आणि अन्न प्रक्रिया, आरोग्य देखभाल, पर्यटन आणि आदरातिथ्य, संरक्षण आणि एरोनॉटिक्स, नवीकरणीय ऊर्जा यासारख्या संकल्पनांवर या दोन दिवसांच्या परिषदेत चर्चा होणार आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहणार असून उद्घाटनपर सत्राला ते संबोधित करतील.
दक्षिण कोरियाचे व्यापार मंत्री किम ह्युन चोंग, संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री सुलतान बिन सईद अल मन्सुरी यांचे विशेष भाषण या परिषदेत होणार आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे महासंचालक फ्रान्सिस गुरी उद्घाटन सत्राला संबोधित करतील.
या परिषदेदरम्यान दक्षिण कोरियाचे व्यापार मंत्री, संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री, युक्रेनचे पहिले उपपंतप्रधान आणि आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री स्टीफन क्युबिव, कंबोडियाचे वाणिज्य मंत्री, नेपाळचे उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री, मालदीवचे आर्थिक विकास राज्यमंत्री आणि ब्रिटनचे भारतातले उप उच्चायुक्त क्रिस्पीन सिमॉन यांच्याशी सुरेश प्रभू द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबियाच्या प्रतिनिधींचीही प्रभू भेट घेणार आहेत
25 वी भागीदारी परिषद आजपासून मुंबईत
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
January 12, 2019
Rating:
No comments: