नवी दिल्लीः अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या अँटिसॅटेलाईट मिसाईलच्या चाचणीनंतर अंतराळातील कचर्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ‘नासा’चे प्रमुख जिम ब्राइडनस्टाईन यांनी म्हटले होते की, भारताच्या या चाचणीमुळे संबंधित उपग्रहाचे 400 तुकडे झाले व ते अंतराळात फिरत आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक व त्यामध्ये राहत असलेल्या अंतराळवीरांना धोका आहे. अर्थातच ही प्रतिक्रिया भारताच्या यशाने व ‘अंतराळ महासत्ता’ बनल्याने उठलेल्या पोटशुळातूनच आलेली होती. खरे तर खुद्द अमेरिकेमुळेच अंतराळात सर्वाधिक कचरा निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे! ही वस्तुस्थिती खुद्द ‘नासा’च्याच अहवालांमधून स्पष्ट होते.
भारताच्या ए-सॅट परीक्षणानंतर अंतराळात जे उपग्रहाचे तुकडे निर्माण झाले ते कालांतराने नष्ट होऊन जमिनीवर येतील असे भारताने म्हटले होते. भारताच्या परीक्षणानंतर नऊ दिवसांनंतर अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटॅगॉन’नेही म्हटले आहे की हे तुकडे वातावरणातच जळून नष्ट होतील. डीआरडीओने 27 मार्चला अँटिसॅटेलाईट मिसाईल (ए-सॅट)चे परीक्षण केले होते.
‘नासा’च्या नोव्हेंबर 2018 च्या अहवालानुसार अंतराळात 19,173 तुकडे फिरत आहेत. त्यापैकी 34 टक्के अमेरिकेचे आणि केवळ 1.07 टक्के भारताचे आहेत. अंतराळात अमेरिकेने निर्माण केलेले 6,401 तुकडे फिरत आहेत. भारतामुळे निर्माण झालेले तुकडे केवळ 206 आहेत. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार अंतराळात भारताचे 89 तुकडे पेलोड आणि 117 तुकडे रॉकेटचे आहेत. भारतापेक्षा सुमारे 20 पट अधिक कचरा चीनचा आहे. त्यांचे 3,987 तुकडे अंतराळात आहेत.
‘नासा’च्या आकडेवारीनुसार दहा वर्षांच्या काळात सुमारे 50 टक्के कचरा वाढला. सप्टेंबर 2008 पर्यंत अंतराळात 12,851 तुकडे होते. त्यांची संख्या नोव्हेंबर 2018 पर्यंत वाढून 19,173 पर्यंत पोहोचली. या काळात अंतराळात अमेरिकेमुळे 2,142 तुकडे वाढले. मात्र, भारतामुळे केवळ 62 तुकडे वाढले. 2008 पर्यंत अंतराळात अमेरिकेचे 4,259 आणि भारताचे 144 तुकडे होते.
अंतराळात अमेरिकेमुळेच सर्वाधिक कचरा!
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 08, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 08, 2019
Rating:

No comments: