कठुआ : जम्मू-काश्मीरमधील तीन पिढ्या बरबाद करणाऱ्या अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांना या देशाचे तुकडे करू देणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधान हवा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे भले करायचे असेल तर अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांचा पराभव केला पाहिजे. या कुटुंबीयांनी माझ्यावर हवी तेवढी टीका करावी पण त्यांचे कोणतेही कारस्थान मी यशस्वी होऊ देणार नाही.
पंतप्रधान कार्यालय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी सभा घेतली.
ते म्हणाले की, संरक्षण दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (अफस्पा) काश्मीरमधून रद्द करू असे आश्वासन काँग्रेस पक्षाने त्याच्या जाहीरनाम्यात दिले आहे. स्वत:ला देशभक्त म्हणविणारा पक्ष अशी भाषा कशी काय करू शकतो? काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास त्यामुळे संरक्षण दलांचे खच्चीकरण होईल.
जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजिलेल्या समारंभात उपराष्ट्रपतींना शहिदांना अभिवादन केले. मात्र या समारंभाला पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंह उपस्थित नव्हते. त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल मी कधीच शंका उपस्थित केलेली नाही. पण कॅ. अमरिंदरसिंह हे एका परिवाराच्या आरत्या ओवाळण्यात व्यग्र असल्याने ते या कार्यक्रमाला आले नसावेत. काश्मीरी पंडितांचे त्या राज्याच्या खोऱ्यात पुनर्वसन करण्याबाबत भाजप कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत असा दावाही मोदी यांनी केला.
अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांना या देशाचे तुकडे करू देणार नाही
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 15, 2019
Rating:
No comments: